सोमवार, २८ एप्रिल, २०१४

English Grammar - इंग्रजी व्याकरण


Alphabets- अल्फाबेट-मुळाक्षरे

इंग्रजी भाषेत २६ मुळाक्षरे आहेत त्यात ५ स्वर तर २१ व्यंजने आहेत
स्वर : Vowels (5)- a, e, i, o, u
व्यंजने : Consonants (21) – rest all


A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z

The Sentence  (वाक्य)

ज्या शब्दसमुदायामुळे अर्थ पूर्ण होतो त्यास वाक्य म्हणतात.
वाक्याचे चार प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे : 
(१) साधे विधानार्थी वाक्य (Simple or Assertive or Declarative Sentence)
जी वाक्ये केवळ विधान करतात त्यांना साधे वाक्य म्हणतात.
उदा. Sanidhya  is welder.
     Abhay dance well. 

(२) प्रश्नार्थक वाक्य ( Interrogative Sentence)
जी वाक्ये प्रश्न विचारतात त्यांना प्रश्नार्थक वाक्य म्हणतात.
उदा. Where are you go?
       Do you like this room?

सोमवार, २१ एप्रिल, २०१४

भारताचे थोर संत व नेते

स्वामी विवेकानंद

पूर्ण नाव विवेकानंद
नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त(संन्यासाश्रमापूर्वी)
जन्म जानेवारी १२, १८६३
कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
मृत्यू शुक्रवार जुलै ४, १९०२
बेलूर, कोलकाता, भारत
कार्यक्षेत्र धर्म
भाषा बंगाली, इंग्रजी
प्रमुख विषय वेदान्त, योग
प्रभाव रामकृष्ण परमहंस
वडील विश्वनाथ दत्त
आई भुवनेश्वरी नंदलालजी बसु

स्वामी विवेकानंद (जानेवारी १२, १८६३ - जुलै ४, १९०२) हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद ह्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त(नरेंद्र, नरेन ) असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.

जीवन

जन्म आणि बालपण

कलकत्त्यातील सिमलापल्ली (सिमुलिया,उत्तर कलकत्ता) येथे जानेवारी १२, १८६३, सोमवारी सकाळी ६:३३:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमी च्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला.(जानेवारी १२, १८६३ हा दिवस योगा योगाने मकर संक्रती चा होता .) बाळाचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कलकत्ता उच्च न्यायालयात (वकील)अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता. नरेन्द्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इ. छंद होते.

कॉलेज शिक्षण

नरेंद्ररनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज़ इन्स्टिट्यूशन मध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्ट ची आणि १८८४ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

नरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूम, इमॅन्युएल कान्ट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इ. विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सर च्या ‘Education’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. १८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हसी त्यांच्याबद्दल लिहितात : “नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही.” त्यांना ‘श्रुतिधारा’ (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. “एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते.” असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.

विवेकानंद नामकरण

राजा अजितसिंग खेत्री यांनी दि. १० मे १८९३ या दिवशी स्वामीजींना 'विवेकानंद' असे नाव दिले.

शिकागो, अमेरिका येथील सर्वधर्मपरिषद

सप्टेंबर ११, १८९३ साली अमेरिकेतील शिकागो शहरातिल शिकागो - आर्ट इन्स्टिट्युट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती.सुरुवातीस थोडे नर्व्हस असूनदेखील त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो" अशी भाषणास सुरुवात केली आणि सात सहस्र जमावाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला जो दोन मिनिटे अखंड चालू होता."जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असे केले. 'न्यूयॉर्क क्रिटिक'ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की "ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्‌गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत." वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.

समाधी

शुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत आपण जगू ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक उभे आहे.

तत्त्वविचार आणि शिकवण

स्वामीजी हिंदू तत्त्वज्ञानाच्या 'वेदान्त' शाखेचे पुरस्कर्ते होते. आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्त्वज्ञान प्रतिपादित केले.

  • त्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळेच 'शिवभावे जीवसेवा' हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले.
  • प्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी/दैवी आहे.
  • अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.
  • कर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ति मिळवली पाहिजे.
  • उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.

त्यांचे बंगालीतील সখার প্রতি (लिप्यंतरण: 'सखार प्रति') (या मथळ्याचा अर्थ: मराठी:"मित्रास",इंग्लिश: "To a Friend") नावाच्या कवितेतील एक अंश:

मूळ बंगाली उतारा:
বহুরূপে সম্মুখে তোমার, ছাড়ি কোথা খুঁজিছ ঈশ্বর?
জীবে প্রেম করে যেই জন, সেই জন সেবিছে ঈশ্বর। 
देवनागरी लिप्यंतरण:

बहुरुपे सम्मुखे तोमार छाडि
कोथाय खूंजिछो ईश्वर
जीवे प्रेम करे जेई जन
सेई जन सेविछे ईश्वर
अर्थ: ईश्वर अनेक रूपाने तुझ्या समोर उभा आहे. ते सोडून तू कुठे ईश्वराला शोधतोस? जे कोणी प्राणिमात्रांवर प्रेम करतात,तेच ईश्वराची (खरी) सेवा करतात.

 चरित्र

स्वामी विवेकानंदांचे चरित्र सर्वप्रथम इ.स. १८९८ साली, विवेकानंदांच्या हयातीत प्रकाशित झाले. ते चरित्र मराठीत होते.


बाळ गंगाधर टिळक

 

टोपणनाव: लोकमान्य टिळक
जन्म: जुलै २३,इ.स. १८५६
चिखाली, रत्‍नागिरी, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: ऑगस्ट १, इ.स. १९२०
पुणे, महाराष्ट्र, भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
पत्रकारिता/ लेखन: केसरी
मराठा
पुरस्कार: लोकमान्य
धर्म: हिंदू
वडील: गंगाधर रामचंद्र टिळक
आई: पार्वतीबाई टिळक
  बाळ गंगाधर टिळक (जुलै २३,इ.स. १८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढयाचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.

प्रसिद्ध घोषणा/वचने 

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. 

बालपण

टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज रत्‍नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत.
त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका अँग्‍लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली. पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वतः अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले. मृत्यूपूर्वी गंगाधरपंतानी त्यांचा विवाह दहा वर्षाच्या तापीबाई बरोबर करून दिला.

 कसरतीचे महत्त्व 

इ.स. १८७२ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृश होते. त्यांच्या पत्नी तापीबाईपण त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. यावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना चिडवत असत. त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि एक वर्ष आपले लक्ष पूर्णपणे शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केले. त्यासाठी त्यांनी व्यायामशाळेला जाऊन नियमित कसरती व व्यायाम करणे चालू केले. कुस्ती, पोहणे व नौकाचालन (rowing) हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षाअंती त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली. परंतु या काळात त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले व ते प्रथम वर्षाच्या परीक्षेमध्ये नापास झाले. पण त्यांच्या मते, ते एक वर्ष व्यर्थ गेले नव्हते व त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात अनेक शारीरिक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यास झाला.

कॉलेज जीवन

डेक्कन कॉलेजमध्ये असतांना त्यांना अनेक मान्यवंत शिक्षकांच्या हाताखाली शिकता आले. प्रोफेसर वर्ड्‌स्वर्थ आणि प्रोफेसर शूट यांनी त्यांची अभिजात इंग्रजी साहित्यातील रुची वाढवली तर गणित शिकवणाऱ्या प्रोफेसर केरूअण्णा छत्रे यांनी त्यांच्यावर विशेष छाप टाकली. कॉलेजच्या दिवसात त्यांचे वाचनपण प्रचंड होते. त्यांनी संस्कृत धर्मग्रंथे, इंग्रजीमधील राजनीती आणि अतिभौतिकी (मेटा-फिजिक्स) वरील पुस्तके (विशेषतः हेगेल, कांट, स्पेंसर, मिल, बेंथम, व्हॉल्तेअर आणि रूसो) तसेच मराठीमधील संतसाहित्याचे वाचन केले. कॉलेजमधील मित्रांमध्ये ते स्पष्टवक्ते आणि बेधडक म्हणून प्रसिद्ध होते. इ.स. १८७७ मध्ये, गणितामध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन ते बी.ए. झाले. बी.ए.ची पदवी मिळाल्यावर त्यांनी एल.एल.बी. करण्याचे ठरवले. त्यांची गणितातील रुची आणि संशोधनाची आवड पाहता एल.एल.बी. करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या मित्रांसाठी धक्कादायक होता. त्यांनी टिळकांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, " ज्या अर्थी, मी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करण्याचे ठरवले आहे, त्या अर्थी मला असे वाटते की, कायद्याचे ज्ञान मला उपयोगीच पडेल. मला वाटत नाही की माझे आयुष्य ब्रिटिश साम्राज्याविरोधात संघर्षाशिवाय व्यतीत होईल."

सामाजिक मते व उद्गार

 इंग्रजांचे अंधानुकरण 

इंग्रजांचे अंधानुकरण करणाऱ्या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का? असा त्यांचा सवाल होता.

प्लेगविरोधी फवारणीस विरोध

इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका महत्वपूर्ण ठरली . उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा, पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वॉल्टर चार्लस रँड याने लष्कराची मदत घेतली. व त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभगाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करवून घेऊ लागले. आणि साठीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे-लत्ते सर्रास जाळून टाकु लागले, यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला. रँड साहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा टिळकांनी अग्रलेख याच संदर्भातील आहे. टिळक लिहितात : रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहोचला आहे. रँडसाहेबांचे लाडके सोल्जर पायातल्या खेटरासगट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात. घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, हे कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे.

टिळक-आगरकर मैत्री व वाद

डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. आगरकरांकडे केसरीच्या संपादकपदाची धुरा टिळकांनी दिली होती. पण नंतर दोघांत बिनसले. राजकीय स्वातंत्र्य आधी की, समाज सुधारणा आधी या मुद्यावर त्यांच्यात मतभेद झाले. त्यातून दोघांची मैत्री तुटली. आगरकरांना केसरी सोडावे लागले.

न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्युकेशन सोसायटी

त्या काळात विष्णुशास्त्री चिपळूणकर हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते. त्यांचाही स्वतःची शाळा काढण्याचा मानस होता. कॉलेज संपल्यावर टिळक, आगरकर तसेच त्यांचे मित्र नामजोशी, करंदीकर यांनी चिपळूणकरांना मदत करण्याचे ठरवले व १ जानेवारी इ.स. १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. शालेय शिक्षण जितके स्वस्त करता येईल तितके स्वस्त करण्याचा संस्थापकांचा उद्देश होता. पण तसे करतांना शाळेचा दर्जा ढासळणार नाही याचीपण काळजी त्यांनी घेतली. न्यू इंग्लिश स्कूल तत्काळ प्रसिद्ध झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पालक आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवू लागले. १८८०-१८८६ दरम्यानची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळाली.
त्यांच्या कामाला भक्कम पाया आणि सातत्य देण्यासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नावाची सार्वजनिक संस्था उभारण्याचे ठरविले. इ.स. १८८३ च्या सुमारास त्यांनी या कामाला सु्रुवात केली. संस्थेच्या विश्वस्त समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. यामध्ये सर विल्यम वेडरबर्न, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या संस्थापकांपैकी एक असे महादेव गोविंद रानडे, इतिहासकार रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शिक्षणतज्‍ज्ञ एम. एम. कुंटे तसेच प्रख्यात वकील के. पी. गाडगीळ यांचा समावेश होता. तेव्हाचे मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स फर्गसन हे संस्थेचे पहिले देणगीदार होते. त्यांनी संस्थेसाठी १२५० रुपयांची देणगी दिली. सर जेम्स फर्ग्युसन यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी संस्थेच्या कॉलेजचे नाव फर्ग्युसन महाविद्यालय ठेवण्याचे एकमताने ठरवण्यात आले. यामागे एक व्यावहारिक उद्देशपण होता. गव्हर्नरचे नाव कॉलेजला दिल्यामुळे अनेक भारतीय संस्थानिक स्वतःहून देणगी देण्यासाठी पुढे आले आणि जानेवारी २ इ.स. १८८५ ला फर्ग्युसन कॉलेज अस्तित्वात आले. फर्गसन कॉलेजच्या संस्थापकांचे स्पष्ट मत होते की पाश्विमात्य शिक्षणाचा भारतात प्रसार होणे अत्यंत निकडीचे आहे. चिपळूणकर आणि टिळक तर इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणत. संस्थेच्या कामाने प्रभावित होऊन सरकारने डेक्कन कॉलेजचे व्यवस्थापन संस्थेला सुपूर्त करण्याचा प्रस्ताव मांडला. पण संस्थेच्या आजीवन सदस्यांनी याला नकार दिला. याला अनेक कारणे असली तरी मूळ कारण सरकारची दोन युरोपियन शिक्षक ठेवण्याची अट हे होते.
पण संस्थेच्या अन्य सभासदांसमवेत बाह्य-उत्पन्नाच्या विषयावरून झालेल्या वादामुळे डिसेंबर इ.स. १८९० मध्ये टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला आणि स्वतः पूर्णवेळ केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे संपादन करू लागले.

दु्ष्काळ

इ.स. १८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतकऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. त्यांच्या स्वयंसेवकांनी महाराष्ट्रभर गावागावात फिरून लोकांना 'Famine Relief Code' बद्दल माहिती देणारी पत्रके वाटली. याबरोबरच धनिकांनी व दुकानदारांनी अन्न व पैसा दान करावे असे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी चालवल्या गेल्या.

प्लेगची साथ, राजद्रोहाचा खटला व तुरुंगवास

इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. ऑक्टोबरमध्ये मुंबईत गाठीच्या प्लेगची साथ पसरली व १८९७ येईपर्यंत ही साथ पुण्यापर्यंत पोहोचली. रँडच्या प्रशासनाने या बाबतीत अक्षम्य अतिरेक केला. रोगग्रस्त लोकांसोबतच अनेक निरोगी लोकांनापण केवळ संशयावरून रोग्यांच्या छावणीत हलविण्यात आले. टिळक निर्जंतुकीकरण व सार्वजनिक स्वच्छतेच्या विरोधात नव्हते, पण रॅंडने वापरलेल्या कार्यपद्धतीला त्यांचा विरोध होता, असे डी.व्ही. ताम्हणकरांसारख्या काही लेखकांचे मत आहे.  २३ जून १८९७ ला दामोदर चाफेकरांनी रॅंड व त्याचा सहकारी आयरेस्ट याची गोळ्या घालून हत्या केली. सरकारने पुण्यात कर्फ्यू लावला व संशयितांची धरपकड चालू केली. चाफेकरांना अटक करून फासावर चढवण्यात आले. टिळकांवरपण रॅंडच्या हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण त्यासंदर्भात काहीच पुरावा सरकारला मिळाला नाही. यादरम्यान टिळकांनी केसरीमध्ये "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" व "`राज्य करणे' म्हणजे `सूड उगवणे नव्हे'" हे दोन अग्रलेख लिहिले. रँडच्या खुनानंतर अनेक अँग्लो-इंडियन वृत्तपत्रांनी टिळकांवर टीकेची झोड उठविली. याचाच परिणाम म्हणजे, ब्रिटिश सरकारने टिळकांवर दोन राजद्रोहात्मक लेख केसरीमधून लिहिल्याच्या आरोपाखाली खटला भरला.  या खटल्याची सुरुवात सप्टेंबर ८ , इ.स. १८९७ रोजी मुंबईच्या उच्च न्यायालयात झाली. एकूण नऊ पंचांमध्ये सहा युरोपीय पंच व तीन भारतीय पंच होते. टिळकांच्या बचावासाठी पूर्ण देशभरातून जवळपास ४०,००० रूपये इतका निधी गोळा करण्यात आला. यामध्ये डब्ल्यू.सी. बॅनर्जी, मोतीलाल घोष (अमर बाझार पत्रिकाचे संपादक) व रविंद्रनाथ टागोर या बंगालच्या नेत्यांचा तसेच जनतेचा वाटा उल्लेखनीय होता. यासोबतच बंगालमधून टिळकांची बाजू मांडण्यासाठी वकीलसुद्धा पाठविण्यात आले. हा खटला सहा दिवस चालला व खटल्याच्या शेवटी तीन भारतीय पंचांनी टिळकांकडून निकाल दिला तर सहा युरोपीय पंचांनी टिळकांविरुद्ध. न्यायाधीश जस्टिस स्ट्रॅची यांनी बहुमतानुसार टिळकांना दोषी घोषित केले व १८ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. निकालादरम्यान "Disaffection" (सरकारबद्द्ल अप्रीती) म्हणजे "want of affection" (प्रीतीचा अभाव) या न्यायाधीशांनी केलेल्या व्याख्येवर भारतात तसेच इंग्लंडमध्ये अनेक कायदा-अभ्यासकांनी प्रखर टीका केली.टि़ळकांना तीन महिन्यासाठी डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले व नंतर भायखळ्याच्या तुरुंगात हलविण्यात आले. तुरुंगवासादरम्यान टिळकांना राजकीय कैद्याप्रमाणे न वागवता सामान्य कैद्याची वागणूक दिली जात असे. याचा संस्कृत विद्वान व टिळकांचे परिचित मॅक्स म्यूलर यांनी तसेच इंग्लंडमधील काही नेत्यांनी विरोध केला. याचा परिणाम म्हणजे सरकारने टिळकांना पुण्याच्या येरवडा तुरुंगात हलविले तसेच त्यांना तुरुंगात काही काळ वाचनाची व लिखाणाची मुभा दिली. तुरुंगवासादरम्यान टिळकांनी आर्क्टिक होम ऑफ वेदाज या त्यांच्या पुस्तकासाठी टिपणे बनविली. जेव्हा बारा महिन्याच्या तुरुंगवासानंतर सप्टेंबर ७, इ.स. १८९८ रोजी टिळकांची सुटका करण्यात आली तेव्हा त्यांचे शारीरिक स्वास्थ्य खूप ढासळले होते. मुक्ततेनंतर काही दिवसांतच त्यांची प्रकृती थोडी सुधारली. याच वेळी गोखले, रानडे यांनी स्वदेशीचे आंदोलन छेडले होते. टिळकांनी आपल्या साप्ताहिकाद्वारे, लेखांच्या आधारे हा विचार घरांघरांत पोहोचवला.

जहालवाद विरुद्ध मवाळवाद

तत्कालीन भारतीय नेतृत्त्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करुन वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते.

होमरूल

८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते.

गणेशोत्सव

हिंदूंमध्ये घरांघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. परंतु हिंदुस्थाना मध्ये गणेशोत्सव घरोघरी साजरा केला जात असला तरी त्यास सार्वजनिक स्वरुप कधीच नव्हते, आम्ही सामाजिक दृष्ट्या एकत्र यावं, या साठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडून ती यशस्वी करून दाखवली. टिळक म्हणत, देवा-धर्माच्या नावाखाली लोक एकत्र येतात ना तर हरकत नाही, आणि अशाप्रकारे लोकांना प्रथम एकत्र करून मग त्यांना आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रेरणा देऊ शकतो. आणि अशाप्रकारे लोकांना एकत्र करून टिळकांनी त्यांना इंग्रजी सत्तेविरूद्ध उद्युक्त करायला सुरूवात केली. आणि त्याची परिणीती म्हणून सर्वसामान्य जनतेत इंग्रजी सत्ते विषयी राग निर्माण झाला.

पत्रकारिता

टिळकांनी आगरकर, चिपळूणकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.
सुरुवातीला आगरकरांकडे ' केसरी ' चे संपादकपद तर टिळकांकडे ' मराठा ' या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही ' केसरी ' त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ' केसरी ' चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ' केसरी ' चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', ' टोणग्याचे आचळ ', 'हे आमचे गुरूच नव्हेत ’, ' बादशहा ब्राह्मण झाले ' हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत

साहित्य आणि संशोधन

टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांच्या लिखाणाचे इतर संग्रह खालीलप्रमाणे आहेत, टिळकांच्या बाबतीमध्ये गडकऱ्यांनीच, त्यांच्या गुरूंनीच म्हटलं होतं, की बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विझवावी, या लायकीचे कोणी राहिलेले नाहित.
  • The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित).
  • वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष (Vedic Chronology and Vedang Jyotish)
  • टिळक पंचांग पद्धती. (ही आज कित्येक ठिकाणी विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात वापरली जाते.)
  • टिळकांची पत्रे, एम. डी. विद्वांस यांनी संपादित.
  • Selected documents of Lokamanya Bal Gangadhar Tilak, 1880-1920, रविंद्र कुमार यांनी संपादित.

कौटुंबिक जीवन

कौटुंबिक स्तरावर १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. पत्नी चा देहान्त ...साली झाला. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात पत्नीच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांची जबाबदारी ...नी सांभाळली. पण त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखली जात, आणि ती आगरकरांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती.

लोकमान्य टिळकांवर लिहिलेली काही पुस्तके

  • टिळकांची पत्रे, संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस
  • लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भालचंद्र दत्तात्रेय खेर
  • लोकमान्य टिळक, लेखक : प्र.ग. सहस्रबुद्धे
  • लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); लेखक : द.वि. ताम्हनकर
  • Selected documents of Lokamanya Bal Gangadhar Tilak, 1880-1920, संपादक : रविंद्र कुमार